जालना कव्हरेज न्यूज: श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढी वारीचा पवित्र सोहळा यंदा 19 जून रोजी आळंदी येथून सुरू झाला असून, लाखो भाविक पंढरपूरच्या दिशेने हरिनामाचा गजर करत पायी मार्गक्रमण करत आहेत. 6 जुलै रोजीच्या आषाढी एकादशीसाठी हे वारकरी पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी वाटचाल करत असताना, त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलीस यंत्रणेवर आहे. गर्दीतील चोरी, अपघात, हरवलेली मंडळी यांसारख्या घटनांचा सामना करत पोलीस दल त्यांचे काम जबाबदारीने पार पाडत आहे.
या वारी सोहळ्यात पुणे शहरातील येरवडा पोलीस ठाण्यात कार्यरत प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक शितल दळवी यांचीही महत्वपूर्ण जबाबदारी होती. संगमवाडी पुलावर आणि दिवेघाटाच्या पायथ्याशी वडकी नाला येथील पालखीच्या विसाव्यासाठी बंदोबस्त करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. शितल दळवी यांनी ही जबाबदारी केवळ पोलिसी शिस्तीतूनच नव्हे, तर भक्तीभावानेही पार पाडली.
शेतकरी कर्जमाफी: बच्चू कडूंच्या उपोषणाला यश, मुख्यमंत्र्यांची कर्जमाफीबाबत मोठी घोषणा!
वडकी नाल्यावर पालखी विसाव्यासाठी थांबली असताना शितल यांची आपल्या आई-वडिलांशी अचानक भेट झाली. हा क्षण अत्यंत भावनिक ठरला. त्यांच्या आई-वडिलांनी एक नवस केला होता – “मुलगी पोलीस उपनिरीक्षक झाली तर आळंदीहून पंढरपूरपर्यंत पायी वारी करू.” शितल यांच्या यशानंतर त्यांनी पहिल्यांदाच वारीत सहभाग घेतला आणि योगायोग असा की, त्यांच्या मुलीचाच या वारीत बंदोबस्तासाठी नेमणूक झाली होती.
शितल दळवी म्हणाल्या, “मी याआधी कधीच वारी पाहिली नव्हती. एवढे लोक पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघतात, हे पाहून नेहमी आश्चर्य वाटायचं. एकदा तरी हा अनुभव घ्यावा, अशी इच्छा होती. पोलीस उपनिरीक्षक म्हणून मी या वारीचा भाग झाले, आणि त्यातच भक्ती अनुभवली. मला वाटतं – कर्तव्य हीच माझी वारी आहे.”
शेतकऱ्यांना कर्जमाफी योग्यवेळी, दिलेला शब्द सरकार फिरवणार नाही: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील येवता गावच्या शीतल दळवी या गावातील पहिल्या पोलीस उपनिरीक्षक बनल्या आहेत. त्यांच्या या यशामागे आहे त्यांची मेहनत, जिद्द आणि कर्तव्यनिष्ठा. त्यांचे आई-वडील, सुनीता आणि संतोष दळवी, अशिक्षित असूनही तीन एकर शेतीवर कष्ट करत मुलीला शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. शेतीवर अवलंबून असलेल्या या कुटुंबाने शीतलच्या स्वप्नांना पाठबळ दिले. समाजशास्त्रात बी.ए. पदवी घेतल्यानंतर शीतल यांनी २०१८ मध्ये पोलीस उपनिरीक्षक परीक्षेची तयारी सुरू केली. विशेष म्हणजे, पदवीचा निकाल लागण्यापूर्वीच त्यांनी २०२० मध्ये पूर्व परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले. जुलै २०२३ मध्ये अंतिम निकाल जाहीर झाला आणि शीतल यांची निवड झाली. नोव्हेंबर २०२४ पासून त्यांचे प्रशिक्षण सुरू झाले आणि त्यानंतर पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्यात प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली.
“स्वार्थी असतो तर करोडोत खेळलो असतो” – मनोज जरांगे पाटील; २९ जूनला अंतरवालीत मराठा आरक्षणासाठी बैठक
“कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन” या भगवद्गीतेतील श्लोकाचं जिवंत उदाहरण देणाऱ्या शितल दळवी यांचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. आषाढी वारीच्या मार्गावर, भक्ती आणि कर्तव्याचा अद्वितीय संगम साकार करणाऱ्या शितल यांची ही सेवा, समाजात सकारात्मक विचार आणि प्रेरणेचा झरा निर्माण करत आहे.