अंतरवाली सराटी / जालना कव्हरेज न्यूज: मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याला अंतिम दिशा देण्यासाठी उद्या, रविवारी २९ जून २०२५ रोजी दुपारी १२ वाजता अंतरवाली सराटी (ता. अंबड, जि. जालना) येथे मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी या बैठकीसाठी राज्यातील सर्व मराठा बांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. सोमवार, ३० जूनपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक विशेष महत्त्वाची मानली जात आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला संबोधित करताना सांगितले की, ही बैठक समाजाच्या भवितव्यासाठी आणि गोरगरीब मराठा समाजाच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. “आपल्या समाजाला सन्मानाने पुढे नेण्यासाठी, आपल्या लेकरांना योग्य संधी मिळाव्यात यासाठी ही शेवटची आणि निर्णायक बैठक आहे. घरी बसून सोशल मीडियावर फक्त पाहण्यापेक्षा प्रत्यक्ष येऊन आपली एकजूट दाखवा. आपल्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न मार्गी लावायचा असेल, तर सर्व कामं बाजूला ठेवून एकत्र येणं गरजेचं आहे,” असं भावनिक आवाहन त्यांनी केलं.
“स्वार्थी असतो तर करोडोत खेळलो असतो” – मनोज जरांगे पाटील; २९ जूनला अंतरवालीत मराठा आरक्षणासाठी बैठक
या बैठकीत मराठा समाजाच्या मागण्यांवर सखोल चर्चा होणार आहे. आतापर्यंतच्या आंदोलनात काय मिळालं आणि यापुढे काय मिळवायचं आहे, यावर ठोस निर्णय घेतले जाणार आहेत. जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं की, “मराठा समाजावर होणारा अन्याय थांबला पाहिजे. आपली मुलं उच्च पदांवर, खुर्च्यांवर बसली पाहिजेत. त्यांना अधिकारी बनवायचं आहे. समाजाला मोठं करायचं आहे, आणि त्यासाठी एकजुटीने लढा देणं आवश्यक आहे.”
या बैठकीचा मुख्य उद्देश मराठा समाजाच्या मागण्यांची अंमलबजावणी करून घेणे आणि समाजाला सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा आहे. जरांगे पाटील यांनी सांगितले की, “आपल्या मागण्यांचा अंतिम निर्णय उद्या या बैठकीत होईल. २९ ऑगस्ट रोजी मुंबईत जाण्याची तयारी आहे. तिथे जाऊन आपल्या मागण्यांची पूर्तता करून घ्यायची आहे. यासाठी प्रत्येक मराठा बांधवाने उपस्थित राहून आपली ताकद दाखवावी.”
जरांगे पाटील यांनी पुढे सांगितले की, या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे, ज्या सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांद्वारे पूर्णपणे सांगता येणार नाहीत. “महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठा बांधवांनी अंतरवाली सराटीत यावं. येथे प्रत्यक्ष येऊन सर्व गोष्टी समजून घ्याव्यात. आपली एकजूट दिसली पाहिजे, कारण घरी बसून एकजूट दिसत नाही,” असं त्यांनी ठणकावून सांगितलं.
या बैठकीत मराठा समाजाच्या मागण्यांवर ठराव मांडले जाणार असून, त्यावर ठाम निर्णय घेतले जाणार आहेत. “आपल्या समाजाला खाली राहता कामा नये. आपण सगळ्यांनी मिळून समाजाला उंचीवर नेऊया. आपल्या लेकरांचं भविष्य उज्ज्वल करूया,” असं जरांगे पाटील यांनी आवाहन करताना सांगितलं. या बैठकीनंतर मराठा समाजाच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरेल आणि २९ ऑगस्ट रोजी मुंबईत होणाऱ्या मोर्चाची रणनीतीही निश्चित होईल.
ही बैठक मराठा समाजाच्या एकजुटीचं आणि त्यांच्या लढ्याचं प्रतीक ठरणार आहे. जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज आता अंतिम लढाईसाठी सज्ज झाला असून, येत्या अधिवेशनात सरकारकडून ठोस पावलं उचलली जावीत, अशी अपेक्षा आहे.