डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज) कर्जाच्या ओझ्याने त्रस्त झालेल्या एका ६० वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पांगरखेड येथे गुरुवारी (२ ऑक्टोबर) सकाळी घडली.
मृत शेतकऱ्याचे नाव नारायण आत्माराम नालिंदे (वय ६०, रा. पांगरखेड) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी सप्तश्रृंगी महिला अर्बन बँक तसेच महाराष्ट्र बँकेतून पीककर्ज घेतले होते. मात्र यंदाच्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. कर्जफेड करणे अशक्य झाल्याने त्यांनी नैराश्यातून जीवनयात्रा संपवली असे समजते.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शेतकरी कुटुंबावर शोककळा पसरली आहे. डोणगाव पोलिसांनी प्रकरणी नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.















