बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज)
बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी सध्या दुहेरी संकटाला सामोरे जात आहेत. आधीच पावसाने दडी मारल्यामुळे काळजीत असलेल्या शेतकऱ्यांना आता वाणी आणि हुमणी या कीडांचा सामना करावा लागत आहे. हुमणी ही भूमिगत कीड असून तिने जिल्ह्यातील अनेक भागात धुमाकूळ घातला आहे. परिणामी, सुमारे ७.५ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिके संकटात सापडली आहेत.
काय आहे स्थिती?
यंदा जिल्ह्यात ७ लाख ६६ हजार हेक्टरवर पेरणीचे लक्ष्य होते.
प्रत्यक्षात आतापर्यंत ६ लाख ९७ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे.
यापैकी ४.१८ लाख हेक्टरवर सोयाबीन, तर १.२७ लाख हेक्टरवर कपाशी पेरले गेले आहे.
मात्र, सात दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे आणि हुमणी अळीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
कोणते भाग प्रभावित?
सिंदखेडराजा, चिखली, देऊळगाव राजा, लोणार, मलकापूर, नांदुरा, खामगाव अशा भागांमध्ये सोयाबीनवर हुमणी अळीचा आणि कपाशीवर वाणी किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे.
काय आहेत कृषी विभागाचे उपाय?
कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत पुढील उपाय सुचवले आहेत:
१. शारीरिक उपाय:
आंतरमशागती करताना अळ्या हाताने वेचून नष्ट कराव्यात.
मोकाट पद्धतीने पाणी दिल्यास अळ्या जमिनीच्या वर येतात आणि मरतात.
शेतातील तणांचा बंदोबस्त करावा.
२. जैविक उपाय:
मेटारायझियम अॅनिसोप्ली जैविक बुरशीचे ५० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून झाडांच्या मुळाशी आळवणी करावी.
३. रासायनिक उपाय:
क्लोरोपायरीफॉस २०% प्रवाही कीटकनाशक वापरून मुळाशी आळवणी करावी.
फिप्रोनील ४०% + इमिडाक्लोप्रीड ४०% या मिश्र कीटकनाशकाचे ५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.
शेतकऱ्यांसाठी आवाहन:
हुमणी अळीचा प्रादुर्भाव वेळीच नियंत्रणात न घेतल्यास पिके वाळतात, उत्पादनात घट होते आणि मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे यांनी केले आहे.
















