जालना /जालना कव्हरेज न्यूज: शेतकऱ्यांना युरिया खताचा पुरवठा उपलब्ध असताना न देणाऱ्या कृषी सेवा केंद्रांवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मयूर बोर्डे यांनी केली आहे. आज त्यांनी कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांवर लादल्या जाणाऱ्या लिंकिंगच्या सक्तीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आणि तात्काळ युरिया वाटपाची मागणी केली.
खरीप हंगामाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांना युरिया खताची मोठी गरज असते. मात्र, काही कृषी सेवा केंद्रे युरिया उपलब्ध असतानाही शेतकऱ्यांना ते देण्यास टाळाटाळ करत आहेत. याशिवाय, युरियासोबत इतर नको असलेल्या खतांची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांवर दबाव टाकला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. मयूर बोर्डे यांनी याला ‘लिंकिंगची सक्ती’ असे संबोधत याविरोधात तीव्र शब्दांत निषेध नोंदवला.
दारूच्या नशेत शाळेत गेले मुख्याध्यापक अन् गावकऱ्यांना माहिती होताच… भोकरदन तालुक्यातील घटना
“जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सध्या खरीप हंगामातील पिकांसाठी युरिया ची गरज आहे. अशा वेळी कृषी केंद्रांकडून युरिया न देणे आणि अनावश्यक खतांची खरेदी लादणे हे शेतकऱ्यांची अडवणूक केल्यासारखे आहे. युरिया उपलब्ध असताना तो शेतकऱ्यांना मिळत नाही, याला जबाबदार कोण? कृषी विभागाने तात्काळ पथक पाठवून युरिया वाटप सुनिश्चित करावे आणि दोषी कृषी केंद्रांवर कारवाई करावी,” असे मयूर बोर्डे यांनी निवेदनात म्हटले आहे.