Shetkari Karj mafi: शेतकरी कर्जमाफीवर बावनकुळेंचं मोठं वक्तव्य; मर्सिडीजवाल्यांना कर्जमाफी नाही!

Shetkari Karj mafi: शेतकरी कर्जमाफीवर बावनकुळेंचं मोठं वक्तव्य; मर्सिडीजवाल्यांना कर्जमाफी नाही

अमरावती/जालना कव्हरेज न्यूज: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा (Shetkari Karj mafi) मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. अमरावती जिल्ह्यातील कौडण्यापूर येथे विठ्ठल मंदिर दर्शनासाठी गेले असताना आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी सरकारच्या योजनांबाबत माहिती देताना कर्जमाफीच्या मुद्द्यावर भाष्य केलं. खऱ्या आणि गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल, पण जे शेतकरी शेतीसाठी घेतलेल्या कर्जाचा वापर मर्सिडीज गाड्या, फार्म हाऊस किंवा लेआऊटसाठी करतात, अशांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही, असं त्यांनी ठामपणे सांगितलं.

बावनकुळे म्हणाले, “आमच्या सरकारने शेतकऱ्यांना दिलेला शब्द आहे की, पुढील पाच वर्षे शेतात वीज बिल येणार नाही. तसंच, खऱ्या गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन आहे. पण ज्यांनी शेतीच्या नावाने कर्ज घेऊन विलासी गाड्या घेतल्या, फार्म हाऊस बांधले किंवा लेआऊटसाठी खर्च केला, अशा दांडग्यांना कर्जमाफी मिळणार नाही. कर्जमाफी फक्त गरजवंत शेतकऱ्यांसाठीच आहे.”

शेतकऱ्यांना कर्जमाफी योग्यवेळी, दिलेला शब्द सरकार फिरवणार नाही: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

याशिवाय, त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबतही माहिती दिली. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये देण्याची सुरुवात केली आहे. पुढील काळात ही रक्कम वाढवून २१०० रुपये केली जाईल,” असं त्यांनी जाहीर केलं.

उच्चस्तरीय समितीची स्थापना आणि अधिवेशनात चर्चा

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत ठोस निर्णय घेण्यासाठी सरकार लवकरच एक उच्चस्तरीय समिती स्थापन करणार आहे. बावनकुळे यांनी सांगितलं की, “कालच मुख्यमंत्र्यांसोबत याबाबत सविस्तर चर्चा झाली. ही समिती येत्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात घोषित केली जाईल. येत्या ३ जुलै रोजी दुपारी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्यासोबत विधानभवनातील माझ्या दालनात बैठक होणार आहे. या बैठकीत ८ ते १० मंत्री उपस्थित असतील. या बैठकीत कर्जमाफी आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होईल आणि शासन निर्णय जाहीर केले जातील.”

पावसाळी अधिवेशनात कर्जमाफीचा मुद्दा गाजणार?

३० जून ते १८ जुलै दरम्यान होणाऱ्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी हा महत्त्वाचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे. याशिवाय, शक्तीपीठ महामार्ग आणि शाळांमध्ये हिंदी भाषेची सक्ती यासारख्या मुद्द्यांवरही विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. बावनकुळे यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झालं आहे की, सरकार गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी गंभीरपणे विचार करत आहे, पण याचा लाभ फक्त खऱ्या गरजूंनाच मिळेल.

शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचा सरकारचा निर्धार

महसूलमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित केलं. “आम्ही शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळू. गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी आम्ही योग्य पावलं उचलत आहोत. पण ही कर्जमाफी फक्त खऱ्या गरजवंतांसाठी असेल, दांडग्यांसाठी नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं. येत्या अधिवेशनात या मुद्द्यावर काय निर्णय होतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Join WhatsApp

Join Now

1 thought on “Shetkari Karj mafi: शेतकरी कर्जमाफीवर बावनकुळेंचं मोठं वक्तव्य; मर्सिडीजवाल्यांना कर्जमाफी नाही!”

Leave a Comment

WhatsApp Join Group!